Pune Ring Road :- पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड प्रकल्पासाठी पश्चिम मार्गावरील ३२ गावांचे, तर पूर्वेकडील ४ गावांचे नवीन फेरमूल्यांकनानुसार दर निश्चित झाले आहेत.

ह्या रस्त्यामुळे ८०२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, दोन हजार ५८१ स्थानिक बाधित होत आहेत. सर्व बाधितांना येत्या ३१ जुलैपर्यंत नोटिसा बजावून उप विभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करून संमतिपत्र घेण्याचे आदेश दिल्याने दीर्घ कालावधीनंतर रिंग रोड प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासनाच्या निर्देशानुसार पश्चिम आणि पूर्व भागातील बाधित गावांचे फेरमूल्यांकन केले आहे. पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यांतील ३२ गावांतील ६९७ हेक्टर क्षेत्रातील दोन हजार ४०४ स्थानिक बाधित होणार आहे,

तर पूर्वेकडील भोर तालुक्यातील ४ गावांतील १०५ हेक्टर क्षेत्रातील १७७ स्थानिक बाधित होत आहे. या स्थानिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे.

रस्त्यासंदर्भात मूल्यांकन प्रक्रिया पार पडल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेत भूसंपादन करताना भूधारकांना विश्वासात घेऊन नोटीस बजावणे, त्यांची संमती घेणे, जे भूधारक मयत आहेत किंवा बाहेरगावी आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून वारसांकडून संमतिपत्र, हमीपत्र तयार करून घेणे, करारनामे, निवाडे आदी विषयासंदर्भात कार्यशाळा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा रिंग रोडचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत.

पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील पाच, हवेली ११, मुळशी १५ आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधित होणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रिंग रोडच्या पश्चिमेकडील बाधित ३२ गावांचे फेरमूल्यांकन करून दर निश्चिती केली आहे, तर पूर्वेकडील ४८ गावांपैकी ४ गावांची दरनिश्चिती झाली असून, ४२ गावांचे अंतिम दर निश्चित करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दर निश्चित झालेल्या गावांमध्ये बाधितांना विश्वासात घेऊन संमतिपत्र तयार करण्यात येणार आहे.

त्यासाठी भूधारकांना नोटिसा बजावल्या असून, माहिती देण्यासाठी गावनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. संमतिपत्र आणि संमती करारनामा होताच भूधारकाला २५ टक्के वाढीव मोबदला देण्यात येईल असे डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे यांनी सांगितले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *