Pune Ring Road Breaking : पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवड शहराचा देखील गेल्या काही दशकात झपाट्याने विस्तार झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील वाढलेली लोकसंख्या आणि शहराचा झालेला विस्तार यामुळे शहरात वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. परिणामी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा रस्ते विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प आहे पुणे रिंग रोडचा. पुणे रिंग रोड प्रकल्प प्रामुख्याने पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारला जात आहे. हा प्रकल्प 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंद असा आहे. याचे काम मात्र एकूण दोन टप्प्यात केले जाणार आहे.

पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे दोन भागात हा प्रकल्प विभागण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सध्या फेर मूल्यांकनाचे काम सुरु असून पश्चिम भागातील फेरमुल्यांकन पूर्ण झाले असून पूर्व भागातील फेरमूल्यंकनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष बाब म्हणजे पश्चिम भागातील जमिनीसाठी दर निश्चिती देखील करण्यात आली आहे.

अर्थातच पश्चिम भागामध्ये बाधित होणाऱ्यां शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात जमिनीचा मोबदला देऊ केला जाणार आहे. त्यापूर्वी यासंदर्भात संबंधित जमीन धारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. जूनअखेरपासून प्रकल्पग्रस्तांची किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे पश्चिम भागासाठी आवश्यक जमिनीचे लवकरच भूसंपादन होण्याचे चित्र तयार होत आहे.

कसा आहे प्रकल्प?
पुणे रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आला आहे. यात पूर्व भागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांतून रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पश्चिम भाग भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांतून प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 26 हजार 800 कोटींचा खर्च लागणार आहे. विशेष म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग 2026 पर्यंत बांधून प्रवाशांसाठी खुला करण्याचे टार्गेट ठेवले आहे.

फेरमूल्यांकन करण्याची गरज काय?
पुणे रिंग रोड साठी याआधी मूल्यांकन करण्यात आले होते. जमिनींचे मूल्यांकन गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार गृहीत धरून करण्यात आले होते. मात्र कोरोना काळात जमिनीचे व्यवहार खूपच कमी झाले आहेत त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला.

अशा परिस्थितीत गेल्या पाच वर्षातील खरेदी विक्रीचे व्यवहार गृहीत धरून नव्याने मूल्यांकन करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यात. या पार्श्वभूमीवर आता पश्चिम भागातील रिंग रोड साठी फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पूर्व भागातील रिंग रोड साठी काही गावात फेरमुल्यांकनाचे काम बाकी आहे.

मात्र हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत फेर मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमिनीचे भूसंपादन केले जाईल, बाधित जमीनदारांना मोबदला दिला जाईल आणि या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन ताब्यात घेतली जाणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *